पुणे : ‘बहिरेपणामुळे व्यक्तीच्या सामाजिक प्रगतीमध्ये अडथळे येतात. चांगले शिक्षण, नोकरी आणि आयुष्यातील इतर संधी त्यांच्यापासून दुरावतात. अनेकदा बहिरेपणाचा फायदा घेऊन, लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होतात. वेळीच निदान आणि योग्य उपचार घेतले, तर तंत्रज्ञानाच्या साह्याने बहिरेपणाची तीव्रता कमी होऊ शकते,’ असे प्रतिपादन मुंबईतील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. दीपाली जोशी यांनी केले.
‘मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग’ आणि ‘फर्ग्युसन महाविद्यालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने, महाविद्यालयाच्या दृकश्राव्य सभागृहात ‘विज्ञानगप्पा’ रंगल्या होत्या. या विज्ञानगप्पांमध्ये त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
कानाची संरचना, आपल्याला ऐकू कसे येते? त्यासाठी आपल्या शरीरात कार्यरत असलेली यंत्रणा, जन्मजात बहिरेपणा का येतो, त्या व्यक्तींना कोणत्या अडचणी येतात? त्या अडचणींवर मात कशी करता येते? या आणि अन्य प्रश्नांना उत्तरे देत, त्यांनी विज्ञानप्रेमींशी गप्पा मारल्या.
डॉ. दीपाली जोशी म्हणाल्या, ‘पर्यावरणीय समस्या, अनुवंशिकता यामुळे जन्मजात बहिरेपणा येऊ शकतो. हे टाळण्यासाठी ध्वनिप्रदूषण कमी होणे आवश्यक आहे. आपल्या कानावर मोठे आवाज पडणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. मूल पोटात असताना गर्भवतीने कर्कश आवाजांपासून दूर राहिले पाहिजे. बहिरेपणा आलाच तर जन्मानंतर लगेच त्याच्या तपासण्या करून योग्य उपचार घेतले, तर काही प्रमाणात ही समस्या कमी होऊ शकते. तसेच कर्णयंत्र व नवीन तंत्रज्ञानाची उपकरणे यामुळे आता उपचार अधिक सोपे झाले आहेत.’
कार्यक्रमाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विद्याधर बोरकर, विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष विनय र. र., सहकार्यवाह संजय मालती कमलाकर, खजिनदार भालचंद्र अत्रे यांच्यासह विज्ञानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. विनय र. र. यांनी अध्यक्षीय भाषण केले. डॉ. विद्याधर बोरकर यांनी आभार मानले.